पुणे, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचे टांगती तलवार होती. या बाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र, हा ठराव एकमताने फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे पुण्यातील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे. सप्टेंबर महिन्यातील पाऊसमान पाहून १५ ऑक्टोबरनंतर शहरातील पाण्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले.
सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील, पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल असे बैठीकीत ठरले.
पवना व चासकमान मध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले. नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.