नाशिक, प्रतिनिधी, दि. १७ एप्रिल २०२४ : जिल्ह्यात पाझर तलावातून गाळ काढण्यासाठी प्रशासनाने जलसमृध्द नाशिक मोहीम हाती घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातील १९१ पाझर तलावांमधील जलसाठा वाढण्यास मदत होईल. मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना वरदान असलेले चणकापूर धरणात देखील मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. धरणाचा मुळ जलसाठा २ हजार ८२४ वरुन २ हजार ७१४ दशलक्ष घनफूटावर आला. धरणातील गाळ वाढत गेल्याने सन २०१२-१३ मध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. यानंतर धरणातील उपयुक्त जलसाठा २ हजार ४२७ दशलक्ष घनफूट निश्चित करण्यात आला. सध्या धरणातील बहुतांशी पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.