मराठवाडा, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यात मार्च अखेरीस मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील १०० लघु प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून, २६९ प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा घटल्याने सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. शहरी भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, पैठण, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, तालुक्यात पाणीटंचाई वाढली आहे.
मराठवाड्यातील ग्रामीण भागांसह शहरात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. टंचाईमुळे अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात टँकर फेऱ्या सर्वाधिक प्रमाणात वाढल्या आहेत. विभागातील मोठ्या ११ धरणांत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत १३.३९ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात १३.७१ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २७.९९ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सहायक मुख्य अभियंता यांनी दिली आहे.