पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यामधील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि त्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या हॉस्टेलमध्ये काम करणारा तरुण तिला त्रास देत होता. तसेच तिच्या खोलीत राहणारी विद्यार्थिनी तिला विविध प्रकारे त्रास देत होती. त्यामुळे पिडीत विद्यार्थिनीने ७ मार्च रोजी स्वत:ला पेटवून घेतले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका बालाजी साळुंके (वय १९, रा. इंजिनियरींग कॉलेज हॉस्टल, भारती विद्यापीठ) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील करत आहेत. मुलींवर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई होण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहेत.