सातारा, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : महावितरणच्या भरारी पथकाने शहरातील थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली असून, आज, मंगळवारी १५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर खडबडून जागे झालेल्या काही वीज ग्राहकांची थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची धावाधाव दिवसभर सुरू होती. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे अकरा दिवस उरले असून, महावितरणला १ लाख ९ हजार घरगुती ग्राहकांकडून थकबाकीपोटी तब्बल ७ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने वसुली मोहिमेला गती दिली असून, वारंवार कल्पना देऊनही वीजबिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासाठी महावितरणने सातारा शहरातील पाच विभागांसाठी सात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.