मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रावर झाली. या परीक्षेत तब्बल चार लाख ५६ हजार ७४८ नवसाक्षरांनी उपस्थिती नोंदवत उत्साहाने परीक्षा दिली असल्याची माहिती शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिली. नवसाक्षरांचे हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे, त्यामुळे आताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही त्यांनी येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येणार असल्याचेही डॉ. पालकर यांनी सांगितले. नवसाक्षरांची ही परीक्षा देशभरात घेण्यात आली होती. त्यावर राज्यातील उल्लास अॅपवरील नोंदणी करणाऱ्या ७४.३ टक्के नागरिकांची उपस्थिती होती. मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलगू, कन्नड, गुजराती आणि बंगाली या नऊ माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली.