मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज्यात कृषी क्षेत्रासाठीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ९ हजार मेगा वॉटच्या कामाची ‘लेटर ऑफ अवार्ड’ म्हणजेच देकार पत्र दिले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर २५ हजार रोजगार निर्मितीही होणार आहे. या प्रकल्पाला ४० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. हा प्रकल्प १८ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
८ लाख सौर ऊर्जा पंप देण्यात येणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ८ लाख सौर ऊर्जा पंप देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना याआधी रात्रीअपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी जायला लागत होते मात्र आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१६ साली ही संकल्पना साकारली होती. या संकल्पनेचा पहिला प्रकल्प राळेगण सिद्धी येथे साकारण्यात आला होता. २००० मेगा वॉट सौर ऊर्जा त्या काळात तयार करण्यात आली होती.