पुणे, ०७ डिसेंबर २०२४, प्रतिनिधी: वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी अद्यापही फेसाळलेलीच आहे. पिंपरी चिंचवडमधील कंपन्या इंद्रायणी नदीच्या पोटात राजरोसपणे विष कालावतात. परिणामी ही नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे. तरी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कुंभकर्णाच्या भूमिकेतून बाहेरचं पडेना. वारकऱ्यांसाठी ही नदी पवित्र मानली जाते. माऊलींच्या दर्शनापूर्वी ते नदीत स्नान करतात, तीर्थ म्हणून हेच पाणी पितात. हे पाहता वारकऱ्यांसह नागरिकांच्या जीवाशी इथं कसा खेळ सुरु आहे, अशी कबुली आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी दिली. गेली सात वर्षे इंद्रायणीच्या पोटात विष कालवलं जातं आहे, म्हणूनच हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनीचं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र तातडीनं पावलं उठवण्याऐवजी सरकारला आणखी वेळ हवा आहे. त्यामुळं सरकारला वारकऱ्यांपेक्षा मूठभर कंपन्या महत्वाच्या वाटतात, असा आरोप केला जातो आहे.