नाशिक, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या जिल्ह्याच्या पर्व भागात दुष्काळाची भीषण परीस्थिती आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही तर शेतकऱ्यांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न सतावत आहे. मालेगाव,नांदगाव आणि देवळा तालुक्यातील असंख्य शेतमजूर व शेतकरी मजुरीसाठी दुसऱ्या तालुक्यात जात असल्याचे विदारक चित्र आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाने अवकृपा केली. खरिपाची पिके पावसाअभावी डोळ्यादेखत करपली तर विहिरींनीही राम म्हटल्याने कांद्याची लागवड रखडली तर रब्बीच्या आशा धूसर झाल्या. खास करून मालेगाव, नांदगाव व देवळा तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. पोटाची खळगी कशी भरायची, मुलाबाळांचे पालनपोषण, शिक्षण कसे करायचे, घरगाडा कसा हाकायचा याची चिंता सतावत आहे. सरकारही या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याने शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे लोंढे वाहने वाहने भरून कळवण तालुक्यात मजुरीसाठी जात असल्याचे विदारक चित्र आहे.