सातारा, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे. दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून १२ बैल वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहचले. ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.