अमरावती, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अमरावती विभागात २६ नोव्हेंबरपासून सतत अवकाळीचा पाऊस, अतिवृष्टी होत आहे. या चार दिवसात तब्बल २,०३,७६४ हेक्टरमधील पिकांना फटका बसला आहे. या आपत्तीमध्ये लहान-मोठ्या ६१० जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १४० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे आता सुरु करण्यात आलेले आहेत.
या आपत्तीमध्ये चार दिवसात ६१० शेळ्या, मेंढ्यासह बैलदेखील मृत झालेले आहेत. यामध्ये २६ नोव्हेंबरला १८५ शेळ्या व मेंढ्या, २७ ला २४४, २८ ला १३० तर २९ नोव्हेंबरला ५१ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अवकाळीच्या चार दिवसात १४० घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये २६ नोव्हेंबरला ५३ , २७ ला २२, २८ ला २६ तर २९ नोव्हेंबरला २६ घरांची पडझड झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अवकाळीमुळे चार दिवसात २,०३,७६४ हेक्टरमधील कपाशी, तूर, हरभरा, फळपिके, भाजीपाला, कांदा, संत्रा, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.