छत्रपती संभाजीनगर, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने नोव्हेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात लवकरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असे चित्र आहे. वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जात नसल्याने नाथसागरालगत असलेल्या पैठण, गंगापूर, वैजापूरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगांवमध्येही नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.