नंदुरबार, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळी अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपली आहे. बाजारात विविध प्रकारचे मातीचे दिवे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र सद्या या दिवाळीला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. आदिवासी महिलांनी आपल्या हाताने तयार केलेल्या पणतीला कशा प्रकारे गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या तयार केल्या जातात.
नंदूरबार जिल्ह्यातील रोजगार अभावी अनेक आदिवासी कुटुंब हे आपल्या रोजगारासाठी गुजरात तसेच इतर राज्यात स्थलांतरित होत असतात. आदिवासी कुटुंबांचं स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात असून आपल्याच गावात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील वाण्याविहिर या गावातील आदिवासी महिलांना एकत्रित करून त्यांचा बचत गट तयार करण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून गावातील ४४ महिलांना गायीच्या शेणापासून विविध प्रकारचे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
गायीचं शेण एकत्रित करत त्यात माती आणि इतर वस्तू मिसळून साचा आणि हाताच्या सहाय्याने विविध प्रकारच्या पणत्या तयार केल्या जात आहेत. कमी वेळेत आणि कमी खर्चात या सुंदर पणत्या तयार होतात. या सोबतच या आदिवासी महिला मेनापासून विविध प्रकारच्या आकर्षक मेणबत्या आणि दिवे, धुपबत्ती, हवन गौऱ्या, धूप कांडी इतर अनेक वस्तू बनवून त्याची योग्य पद्धतीने पॅकेजिंग करून विक्री करत आहेत.
शेणापासून तयार केलेल्या पणती आणि इतर वस्तुंना बाजारपेठेत मोठी मागणी असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जास्त संख्येने पणत्या बनवण्याचे काम या महिला करत आहेत. त्यामुळे या आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.