रायगड, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांकडून परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी वाहनांना लक्ष केले जात आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये बसेस बंद करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. शिक्षणानिमित्त पुणे, औरंगाबाद, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आंदोलनाचा धसका घेतला आहे. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी वेळेत बसेस मिळत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.