रायगड, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं आहे. बुधवारपासून जरांगे यांनी पाण्याचा त्यागही केला आहे. दरम्यान, आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाणार आहे.
सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहे. ओबीसी व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे. जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देणार आहेत. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सरकारला वेळ देण्याची शिष्टमंडळाची मागणी आहे. शिष्टमंडळात सरकारच्या कायदेतज्ज्ञांचाही समावेश असणार आहे.