बुलढाणा, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. येलो मोझ्याकच्या प्रादुर्भावाने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठाकरे गट रोगामुळ पिवळ्या पडलेल्या सोयाबीनच्या रीप घेऊन दाखल झाला आहे. आपला रोष व्यक्त करत तात्काळ पीक विमा द्या आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीची भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.