चंद्रपूर, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं सत्र वाढतच आहे. त्यातल्या त्यात अपघातांमध्ये मृत होणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात आहे. त्याचदरम्यान, चंद्रपुरात भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि ऑटोमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.
चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव ट्रक एका रिक्षावर उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातामुळे घटनास्थळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.