कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ही बैठक मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात झाली. परंतु या बैठकीत अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. कांदा प्रश्नावर मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने व्यापारी आज देखील लिलावात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या काही मागण्यांमुळे गेल्या सात दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत. तरीदेखील व्यापारी बुधवारी पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेणार आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.