गौरी-गणपती विसर्जनानंतर कोकणात गेलेल्या मुंबईकरांची पावले परतीच्या प्रवासाकडे वळत आहेत. यंदा विसर्जनाला लागूनच रविवारची सुट्टी असल्याने शहरवासीयांनी परतण्यासाठी हाच दिवस निवडला. त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवरील एसटी, रेल्वेगाड्या प्रवाशांनी भरून धावत आहेत. मध्य-कोकण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसल्याने कोकणतील रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाला. त्याचबरोबर मुंबईत परतणाऱ्या भाविकांची खासगी बसचालकांकडून जादा तिकीट दर आकारणी करत लूट सुरूच होती. यामुळे परतीच्या प्रवासात अडचणींचे थांबे पार करूनच भाविकांना प्रवास करावा लागला.
दक्षिणेतून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, विशेष एक्स्प्रेस, अतिरिक्त मेमू आणि नियमित एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात ताळमेळ बसविण्यात मध्य-कोकण रेल्वे प्रशासन अपयशी ठरले. त्यातच कोकण रेल्वेवरील काही भागात वेगमर्यादा असल्याने रेल्वे वाहतूक कोलमडली. कोकण रेल्वेवरील जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावत असल्याने त्याचा परिणाम येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर झाला आहे.