कल्याण - नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतामजूर म्हणून ते कामाला आले होते अशी माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे असून रात्री साधारण आठ ते सव्वा आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर - कल्याण महामार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच डिंगोरे परिसरात पाच शेतमजूर मध्यप्रदेश येथून आले होते. मात्र संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी ही भरधाव वेगात होती. त्या गाडीने या पाच मजुरांना जोरात धडक दिली आणि त्यात ते चिरडले गेले. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई करत तिथे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे.