सततच्या पावसामुळे नर्मदा नदीला मोठा पूर आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या नर्मदा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नर्मदा नदीचे पाणी गावात शिरल्याने धडगांव तालुक्यातील सावऱ्यादीगर, भमाणा, खापरमाळ, उडदया बादल, बाबरी गावातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली असून धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या सावऱ्यादिगर पुलांचे काम अर्धवट असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. शासनाकडून सदर पुलासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली असली तरी देखील पुलाच्या कामाला सुरवात झालेली नाही आहे. तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले भरून वाहत असून नर्मदा नदीत पाणी भरल्याने बॅकवॉटर पूर्ण भरले आहे. नदी ओलांडण्यासाठी शासनाकडून बाजची सुविधा उपलब्ध करण्यात आली असली तरी मागील दोन ते तीन दिवसांपासून नादुरुस्त असल्याने बंद आहे. त्यामुळे नदी ओलांडण्यासाठी नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मात्र प्रशासनाचे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तात्काळ बाज दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी करत आहे.