ठाणे, ११ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी 'ठाणे बंद' पुकारण्यात आला आहे. या बंदला सर्व मराठा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गाने बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केला आहे. तर या बंदच्या आडून शहरात कायदा - सुव्यस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे शांततेत बंद यशस्वी केला जाईल, असे प्रतिपादन सकल मराठा समाज समन्वयकांनी केले आहे.