नाशिक, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: काल झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी पावसाची विश्रांती दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरात देखील आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे. राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून काल दिवसभर शहरात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
पाऊस कमी झालेल्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून सध्या ५४३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला. गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरे पाण्याखाली गेली असून जिल्ह्यातील इतरही काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यात मागच्या दोन दिवसात कळवण, इगतपूरी, त्र्यंबक या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.