अलिबाग, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: श्रीवर्धन पाठोपाठ आता चरस या अमली पदार्थांच्या पिशव्या अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील किनाऱ्यांवर सापडण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक मच्छीमार, ग्राम रक्षक दल, सागरी रक्षक दल, तटरक्षक दलाच्या मदतीने अश्या वेगवेगळ्या यंत्रणांची मदत घेत सागरी किनारा पिंजून काढला जात आहे. सागरी किनारी असलेल्या पोलीस ठाण्यामार्फत शोध मोहीम सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पोलीसांच्या शोध मोहिमेदरम्यान मुरुड तालुक्यातील कोर्लई आणि अलिबाग तालुक्यातील थेरोंडा इथं ११ पाकिटे सापडली आहेत. त्यामुळे आतापर्यंत रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेल्या चरस पाकीटांची संख्या ११८ झाली आहे. तरी पोलीसांची शोध मोहीम अजूनही सुरूच आहे. सोबतच विविध यंत्रणाच्या मदतीने किनाऱ्यांची झाडाझडती पोलिसांकडून सुरूच आहे. जर कोणाला पाकीटे दिसून आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात आले आहे.