जेएनपीटी, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने निर्यातीच्या कांद्यावर ४० टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला. याचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यात शुल्क वादाचा थेट फटका कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावलं असून व्यापाऱ्यांची हे निर्यात शुल्क भरण्याची तयारी नाहीये. यामुळे जेएनपीटी बंदर परिसरात निर्यातीसाठी आलेला ८०० टन कांदा सडल्याचे समोर आले आहे.
केंद्राच्या शुल्क वाढीच्या निर्णयामुळे जेएनपीटी बंदर परिसरात आलेला सुमारे २०० कंटेनर कांदा अडकला होता. काही व्यापाऱ्यांनी शुल्क भरून कांदा निर्यात केला तर काही व्यापाऱ्यांनी कांदा परत मागवत स्थानिक बाजारपेठेत विकला. मात्र परतीचे मार्ग बंद झाल्याने २५ कार्गो कंटेनरमधील सुमारे ८०० टन कांदा सडल्याचे आता समोर आले आहे.