कल्याण, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावर कल्याण जवळ तांत्रिक बिघाड झाला. कल्याणच्या फलाट क्रमांक ६ आणि ७ च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. गाड्या किमान दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. यामुळे फलाटावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मात्र काही वेळातच रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.