सांगली, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आश्रम शाळेतील जवळपास १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=Sya0YJYiNSo
जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. शाळेचं नाव समता आश्रम असं आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ सुरु झाली. अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरून गेले होते. मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.
१७० विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ रुग्ण सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत, त्याचबरोबर त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाकीचे विद्यार्थी मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.