मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. रविवारपासून या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.
आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांना सुखकर प्रवास करता यावा म्हणजेच रस्त्यावरील खड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळं जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पळस्पे ते वाकण फाटा दरम्यान १६ टना पेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी असेल. त्यामुळं रविवार, २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अवजड वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे.