नाशिक, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. पुन्हा एका तरुणाची भरदिवसा हत्या झाल्याने नाशिकमधील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे दिसत आहे. संदीप आठवले, असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिकच्या लेखानगर परिसरात सर्वांदेखत चारपाच जणांच्या टोळक्याने संदीपची धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मागच्या आठवड्यात दोन दिवसात सलग दोन हत्या झाल्या. पैकी पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या झाली. मयुर दातीर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबड येथील महालक्ष्मी नगर येथे ही घटना घडली. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने आणि आर्थिक कारणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविचेछेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. याप्रककरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. भरदिवसा नागरी वस्तीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाढत्या घटना पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘अंकुश’ राहिला नसल्याची चर्चा सुरू आहे.