मुंबई, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचा संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. अर्थतज्ज्ञ विवेक देबराय यांनी संविधान बदलण्याबाबतचा लेख लिहिला आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईल यांनीही भारताच्या संविधानाचा ढाचा बदलण्याची भूमिका मांडली आहे. यावरून भाजपाला संविधान बदलायचं आहे हे स्पष्ट होत. त्याचा आम्ही निषेध करतो. देबराय यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा, असं आव्हानच नाना पटोले यांनी केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना सातत्याने संविधान बदलण्याची मागणी करत असतात. भाजपाच्या जे मनात आहे तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांच्या विचारांचे होते. असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच विवेक देबराय आणि रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली.
कुठला सर्व्हे काय सांगतो माहिती नाही. पण इंडियाला लोक पसंती देतील असं चित्रं आहे कारण बेरोजगारी आणि महागाई वाढलेली दिसत आहे. लोक त्याला कंटाळले आहेत. महागाईने सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे लोक मतपेटीतून या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.