पनवेल, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायला शिकावे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते पनवेल येथे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते. निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि अजित पवार यांना टोमणे मारले. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे. मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार... अशी फटकेबाजी राज ठाकरे यांनी केली.
https://www.youtube.com/watch?v=MI4eVzk0t0I
अमित ठाकरे ज्या मार्गावरून गेले त्याच मार्गावरील टोलनाक्यावर तोडफोड झाली. या मुद्यावर भाजपच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. रस्ते बांधायला आणि टोलनाके उभे करायला शिका असे सांगण्यात आले. याला उत्तर देताना दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिका असे राज ठाकरे म्हणाले.
बंदुकीच्या धाकात गाडीत झोपून गेलेली व्यक्ती नंतर मी तिथे होतो का गाडीत असा सवाल करते, हा निर्लज्जपणाचा कळस आहे; असे राज ठाकरे म्हणाले. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि हे सगळे आले; असेही राज ठाकरे म्हणाले.
चांद्रयान जे चंद्रावर गेले आहे त्याचा काय उपयोग आपल्याला. तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते यान महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता; असे राज ठाकरे म्हणाले. ते मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या स्थितीविषयी बोलत होते. पनवेलमधून निघणारा महामार्ग गोव्यापर्यंत जातो. याच रस्त्याचा एक भाग नाशिकच्या दिशेने जातो. या रस्त्याची अवस्था पण वाईट आहे. सगळीकडे खड्डे झाले आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
रस्त्याचे मोठे काम २००७ मध्ये सुरू झाले. वेगवेगळ्या पक्षांची सत्ता येऊन गेली पण परिस्थिती बदलली नाही. रस्ते खड्ड्यांतून जात आहेत. हे एवढे वाईट दिसत असूनही मतदान होत आहे आणि रस्त्यांकडे दुर्लक्ष करणारेच निवडून येत आहेत. त्याच त्याच लोकांना मतदान होत आहे. म्हणजे आम्ही खड्ड्यातून गेलो काय किंवा खड्ड्यात मेलो काय, तुम्हाला कधीच काही वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा लागेल, यांना एकदा घरी बसवावं लागेल; असे राज ठाकरे म्हणाले.
एवढा मोठा समृद्धी महामार्ग ४ वर्षांत बांधून होतो. पण मुंबई - गोवा महामार्गाचे काम १५ - २० वर्ष चालते. आतापर्यंत या रस्त्यावर १५ हजार ५६६ कोटी रुपयांचा खर्च झाला. एवढे सगळे होऊनही रस्त्यावर खड्डे दिसतात. मग कोकणचे खासदार आणि आमदार करतात काय. यांच्यातील किती जणांनी रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे, गडकरींची, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वारंवार बातचीत करून सतत परिस्थितीचा आढावा घेतला आहे; असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1691728029112996324
https://twitter.com/mnsadhikrut/status/1691718598828384386
मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सगळीकडे काम करावे लागेल. लोकांना त्रास द्यायचा नाही. पण आंदोलन असे करायचे की सरकार हलले पाहिजे. लवकर रस्ता झाला पाहिजे. रस्ता झाल्यानंतर तर कोकणावर जास्त लक्ष ठेवावे लागेल. कोण जमिनी पळत नाही ना हे बघावे लागेल. कोकणात उद्योग आले पाहिजेत पण सौंदर्य राखून आले पाहिजेत; असे राज ठाकरे म्हणाले.