हिंगोली, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाभुळगाव परिसरात एका खाजगी शाळेच्या बसचा अपघात झाला. बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांना घरून शाळेत घेऊन येताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जवळपास १२ ते १५ विद्यार्थी जखमी झाले असून, यामध्ये काहींना किरकोळ मार लागलाय तर काहींना मुक्कामार लागला आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेल्या या बसचा चालक मध्येच बदलण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही माहिती दिली असून ड्रायव्हर बदलल्यानेच अपघात झाल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान विद्यार्थी घेऊन जाताना चालक बदलल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
रस्त्यावर खड्ड्यामुळे वाहने उलटली
परभणीच्या सोनपेठ शहरातील प्रमुख मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. याच खड्ड्यांमुळे एक रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. या घटनेमध्ये ऑटोचालक गंभीरित्या जखमी झाला असून प्रशासनाने रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. या अगोदर देखील या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. परंतु प्रशासन या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.