ठाणे, ११ जुलै २०२३, प्रतिनिधी: लांबलेला पाऊस आणि बारवी धरणात जून महिना अखेरीस उरलेला अवघा २७ टक्के पाणीसाठा पहाता ठाणे जिल्ह्यात पाणी कपात करण्यात आले होते. परंतू जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे बारवी धरणातील पाण्याची पातळी उंचावली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठा पाच टक्क्याने कमी आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने व पावसास समाधानकारक सुरुवात झाल्याने ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे मळभ दूर झाले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागाला पाणी पुरवठा केला जातो. यात ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणी पुरवले जाते.
बारवी धरणाची उंची ७२.६२ मीटर इतकी असून ३३८.८४ दशलक्ष लिटर इतकी पाणीसाठा क्षमता आहे. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर ठाणे जिल्ह्याला पुरेल इतका पाणीसाठा धरणात होऊ लागला. आणि वर्षानुवर्षे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी कपातीची समस्या दूर झाली होती. परंतू यंदा मार्च महिन्यात दक्षिण पॅसिफिक महासागरात अॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली होती.