२१ जुलै, २०२४ चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर, काही नागरिक पुरात अडकून पडले आहेत. या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी तसेच पूर पिडीतांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व पूर पिडीतांची जिल्हा प्रशासनामार्फत योग्य काळजी घेण्यात येत असून राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिनांक २० व २१ जुलै २०२४ दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांना सदर कालावधीत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. २१ जुलै २०२४ रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास ७४० घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान तसेच शेताचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.