नाशिक, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील मुख्य सणांमधील एक असणारा म्हणजे रक्षाबंधन होय. या सणांनिमित्ताने सगळ्याच बहिणी आपल्या भावाला राखी बांधून आपली रक्षा करायला सांगत असतात. हिंदू धर्मात मारुतीला देखील महिला राखी बांधत असतात.
मात्र निसर्गप्रेमी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी वृक्षाला राखी बांधून आपलं निसर्ग प्रेम व्यक्त केलं आहे. नाशिकमध्ये मंगळवारी अनोखा रक्षाबंधन सोहळा पार पडला. शहरातील आरवायके-बीवायके महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
भाऊ आणि बहीण यांचे नाते अधोरेखित करणारा रक्षाबंधन सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी,पर्यावरण जनजागृती बाबत संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. वृक्षाच्या खोडाला जैवविघटन राखी बांधून हा उपक्रम करण्यात आला.