नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाची २५० पेक्षा कमी जागांवर सरशी होत असल्याचे चित्र आहे. रालोआने बहुमत मिळवले आहे पण २०२४ मध्ये भाजपाला स्वबळावर बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकणे शक्य झालेले नाही. भाजपाने स्वबळावर २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा मिळवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. औपचारिकता म्हणून हा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे. या नंतर परंपरेनुसार राष्ट्रपतींकडून पुढील निर्णयापर्यंत नरेंद्र मोदी यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाईल. यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ सत्ता स्थापनेसाठी औपचारिक दावा सादर करण्याची शक्यता आहे. हा दावा सादर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मोदींना सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केला जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने मंगळवार ४ जून २०२४ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत सादर केलेल्या आकडेवारीनुसार...
भारतीय जनता पार्टी देशात २४० जागांवर आघाडीवर / विजयी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात १० जागांवर आघाडीवर / विजयी
राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशात २९१ जागांवर आघाडीवर / विजयी
राष्ट्रीय लोकशाही आघाडी महाराष्ट्रात १८ जागांवर आघाडीवर / विजयी