मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावरून वातावरण तापलेलं असताना आता राज्य सरकारकडून तिथली १२० एकर जागा मुंबई महापालिकेला देण्याची मंजुरी देण्यात आली. या जागेवर मुंबई महापालिका सेंट्रल पार्क आणि ओपन स्पेस विकसित करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकास योजना
महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला भाडेपट्टयाने दिलेल्या भूखंडावरील कराराची मुदत संपली. या ठिकाणी भव्य उद्यान करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. त्याला सरकारने मंजुरी देखील दिली होती. त्यानंतर आता महालक्ष्मी रेसकोर्सवरील २११ एकर जागेपैकी ९१ एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित १२० एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
पुनर्विकास योजनेवरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. "रेसकोर्सची जागा महापालिकेच्या ताब्यात जरी दिली असेल तरी तिथे रेसकोर्ससारखी मोकळी जागा राहावी.... मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे येऊ नयेत...असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत.... RWITCच्या माध्यमातून जो करार केला गेला तो कोणाच्या फायद्यासाठी केला, त्या बैठकीत कोण होतं याबाबत आम्ही चौकशी करुच. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्राला ही जागा मिळू नये ही आमची मागणी असून त्यासाठी आम्ही लढा उभारू," असे आदित्य ठाकरे म्हणाले....
मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप केला होता.... यासाठी वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं....मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
मुंबई महापालिकेने काय सांगितले ?
रेसकोर्सवरील १२० एकर जागेवर उद्यान उभारणार आहे. ते कोस्टल रोडवरील उद्यानाला भूमिगत मार्गाने जोडले जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही.