ठाणे : जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत धो धो पाऊस कोसळला नाही तर मुंबई व ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीकपातीपासून अनेक गंभीर निर्णयांची टांगती तलवार मोठ्या लोकसंख्येच्या डोक्यावर आहे. धरणांमध्ये दरवर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस होऊन १५ जुलैपर्यंत ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झालेला असतो. जुलैअखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणे ओव्हरफ्लो होतात. जूनच्या सुरुवातीला पाऊस आला. पण उर्वरित दिवस कोरडेच गेले. जुलै महिना उजाडला तरी धरण क्षेत्रात पावसाची उघडीप आहे. धरण परिसरात ऊन पडलेले असते. येत्या १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास मुंबई व ठाण्यातील किमान दोन ते सव्वादोन कोटी लोकांच्या तोंडचे पाणी पळून जाईल.