रायगड : पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारी शेवळा ही रानभाजी बाजारात दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या भाजीला चांगली मागणी आहे. त्यामुळे १०० ते १५० ग्रॅमची जुडी यंदा १० रुपयांनी महागली आहे. ही भाजी विकून आदिवासींच्या हातात चांगले पैसे येतात. जिल्ह्यात सर्वत्र पर्जन्य पडल्यामुळे जंगल व डोंगर भागात शेवळा उगवली आहे. ही भाजी तयार करण्यासाठी बोंडग्याचा पाला लागतो, कारण या पाल्यामुळे भाजी खवखवत नाही. त्यामुळे आदिवासी महिला शेवळाबरोबरच बोंडग्याचा पालादेखील जुडीसोबत ठेवतात. सध्या २० ते ३० रुपयांना शेवळ्याची जुडी मिळत आहे.