छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा ९० टक्के झाला असून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडीची पाणीपातळी एका महिन्यातच १३ वरून ९० टक्क्यांवर आली आहे. धरणात सध्या १६ हजार १८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणीपातळी ९५ टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात येईल अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.