नवी दिल्ली : निवडणूक यंत्रावर नोंदवण्यात आलेली मते आणि मतपावत्या यांची पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका काही आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर झाली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल २०२४ रोजी फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका पण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे निवडणुकांसाठी निवडणूक यंत्र आणि मतपावती यंत्र यांचा वापर यापुढेही सुरू राहणार यावर शिक्कामोर्तब झाले.
निवडणूक यंत्र आणि मतपावती यंत्र यांची विश्वासार्हता पडताळून झाली आहे. राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने संधी दिली त्यावेळी एकाही पक्षाने यंत्र हॅक करन दाखवले नाही. यामुळे निवडणूक यंत्र आणि मतपावती यंत्र ही दोन्ही यंत्र सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले. प्रत्येक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा अशी चोख व्यवस्था असते. या बाबींचा विचार करुन २६ एप्रिलचा निर्णय कायम ठेवत आहोत. पुनर्विचाराची आवश्यकता नाही; असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.