Friday, October 11, 2024 10:58:37 PM

Panvel
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.

नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.  वायुदलाचं C-295 हे विमान  धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. तसेच विमानावर पाण्याचा फवारा मारत सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी उड्डाण केलं.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी  विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, संजय शिरसाट, खा. श्रीरंग बारणे,  खा. सुनील तटकरे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक,आ. प्रशांत ठाकूर, आ महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह इकबाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  C 295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसून फोटोसेशन केले.  तसेच विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून बाहेर हात उंचावला.

यावेळी माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे सांगितले. या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे असे ते म्हणाले. विजयादशमीच्या आदल्या दिवशी हे यश मिळणे ही आनंदाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. "मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल.  वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प - फडणवीस

नवी मुंबई विमानतळाच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दर वर्षी अंदाजे नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
चार टर्मिनल आणि दोन समांतर धावपट्ट्या
विमानतळावर ३५० विमानं उभी करण्याची सोय
वार्षिक प्रवासी क्षमता ९ ते १० कोटी प्रवासी
मुंबई महानगर क्षेत्रातले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo