मुंबई : दक्षिण मुंबईतील ‘बॅकबे रेक्लमेशन’च्या ब्लॉक तीन ते सहाच्या विकास आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेपासून मेट्रोपर्यंतच्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जल पर्यटनाला चालना देण्यासाठी नरिमन पाँइंटला मरिना प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रस्तावास मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीए प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली असून यासंदर्भातील आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे.
बॅकबे रेक्लमेशन ही योजना १९२० या साली तयार करण्यात आली होती. यामध्ये आठ ब्लॉकचा समावेश होता. त्यापैकी आतापर्यंत तीन ते सहा ब्लॉक वगळता इतर परिसर विकसित करण्यात आला आहे. त्यानंतर आता विकासापासून वंचित असलेल्या परिसरासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम २६ अंतर्गत सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टी मुक्त परिसर करण्यासाठी झोपु योजना आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रोचा विचार करण्यात येणार आहे. यावेळी नवीन विधानभवनाचा विस्तार तसेच नवे जोडरस्तेही प्रस्तावित करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जल पर्यटनाला चालना देण्यासाठी मरिना प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे.