मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे २१ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. एकाच घरातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. नव्या नियमानुसार एक विवाहित आणि एक अविवाहित महिला अशा एका कुटुंबातील दोन महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील. ज्यांनी १ जुलैपासून पुढील ६० दिवसांत कधीही अर्ज केला असेल त्यांना १ जुलैपासूनचे पैसे दिले जातील. तसेच १ ऑगस्टनंतर जे अर्ज करतील, त्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी म्हणून अंगणवाडी सेविका आणि सेतू केंद्रांना प्रति व्यक्ती किंवा प्रती अर्जासाठी ५० रुपये राज्य सरकार देणार आहे. या वरचे पैसे जर सेतू केंद्राने घेतले, तर ते सेतू केंद्र रद्द केले जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिलांनी ऑनलाईन अर्ज करावे, यामुळे पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास मदत होईल, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस विधान परिषदेत बोलत होते.