नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो शेतकऱ्यांच्या हिताचा. केंद्र सरकारने देशातील नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत सतराव्या हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित केली. सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली. केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला सतराव्या हप्त्याची रक्कम म्हणून दोन हजार रुपये थेट बँक खात्यात मिळाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी वाराणसीत मतदारांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना सन्मान निधी थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला.