मुंबई : केंद्र सरकार दलित आरक्षणात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दलित समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार ठाम आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. सरकारने यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात एकमताने ठराव मंजूर केला आहे, ज्यात दलित समाजाच्या हक्कांना संरक्षण देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका राज्याच्या केस संदर्भात निकाल दिला होता. क्रीमी लेयर आणि एससी/एसटी आरक्षणातील वर्गीकरणाबाबत हा निकाल दिला होता. अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांचे आरक्षण रद्द होईल अशी बोंबाबोंब या निकालानंतर सर्वत्र सुरू झाली. यावर वैष्णव म्हणाले की काही राजकीय पक्ष आणि विरोधकांनी दलित आरक्षणाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र मोदी सरकारच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही. दलित समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या ठरावामुळे दलित समाजामध्ये असलेल्या कोणत्याही शंका-कुशंकांना पूर्णविराम अपेक्षा आहे. मोदी सरकारने या घोषणेद्वारे आपल्या दलित समाजासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.