मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. बैठकीला निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच मुंबई, ठाणे, पालघरचे महानगर पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी २०० किंवा त्यापेक्षा जास्त घरे असलेल्या निवासी संकुलात विशेष मतदान केंद्रांची उभारणी करावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिले. मतदार याद्या अद्ययावतीकरण, मतदार यादीतील नावे कमी करणे तसेच नवीन मतदारांची नावं समाविष्ट करणे, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आदी कामांचे नियोजन या विषयावर बैठकीत चर्चा झाली. नवीन मतदान केंद्रे उभारणे, मतदार कार्डांची छपाई आणि वितरण त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्याही सूचना भारत निवडणूक आयोगाकडून यावेळी देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदीबाबतही भारत निवडणूक आयोगाकडून माहिती घेण्यात आली.