नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाने २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा मिळावल्या होत्या. या उलट २०२४ मध्ये भाजपाला अनपेक्षित निकालाचा फटका बसला आहे. भाजपाला २५० पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआकडे बहुमत आहे. पण भाजपाला कमी जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेच्या गणितांवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कल आणि निकालांनुसार महाराष्ट्रात मविआ २९ जागांवर तर महायुती १८ जागांवर आघाडीवर किंवा विजयी झाली आहे. इतर एका जागेवर आघाडीवर किंवा विजयी झाले आहेत. देश पातळीवर रालोआला ३०० पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाचा वाटा मोठा आहे. पण भाजपाने २५० पेक्षा कमी जागा जिंकल्या आहेत.
भाजपाला उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या. यामुळे भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली. भाजपाने २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात ८० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला होता. पण २०२४ मध्ये भाजपाने ८० पैकी ३३ जागांवर आघाडी किंवा विजय मिळवले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने २०१९ मध्ये ४२ पैकी १८ जागा जिंकल्या पण यावेळी त्यांना जेमतेम १२ जागांवर आघाडी वा विजय मिळवणे शक्य झाले. महाराष्ट्रात २०१९ मध्ये २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाने यावेळी फक्त १० जागा जिंकल्या. कर्नाटकात २०१९ मध्ये भाजपाने जनता दल धर्मनिरपेक्षसोबत युती करून २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी कर्नाटकमध्ये भाजपाला जनता दल धर्मनिरपेक्षसोबत युती करून १९ जागांवर आघाडी किंवा विजय मिळवणे शक्य झाले आहे. राजस्थानमध्ये भाजपाने २०१९ मध्ये २५ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी राजस्थानमध्ये भाजपाला १४ जागांवर आघाडी मिळवणे शक्य झाले आहे.