पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात बिबळ्याची दहशत पसरली आहे. पैठणच्या वेगवेगळ्या भागात बिबळ्याचा वावर सुरू असल्याची माहिती मिळू लागल्यामुळे नागरिक दहशतीत जगत आहेत. शेतमजूर शेतात काम करण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे. यामुळे शेतीच्या कामांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेती मशागतीची कामं थांबली आहेत.
बिबळ्या आढळल्याच्या तक्रारी दररोज वेगवेगळ्या भागांतून येत आहेत त्यामुळे वन विभाग संभ्रमात आहे. बिबळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी नेमका कोणकोणत्या ठिकाणी सापळा रचावा, पिंजरा ठेवावा याचे नियोजन करणे वन विभागासाठी कठीण झाले आहे. शेतकऱ्यांचा आणि स्थानिकांचा वन विभागावरील दबाव वाढत आहे.
पंधरा दिवसापुर्वी वडजी येथे बिबळ्याने हरणाचा फडशा पाडला. यानंतर दहा दिवसांनी जळगाव येथे बिबळ्याने बारा वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा काही तासांत मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी शेतात कापूस वेचणी सुरू असताना मागच्या बाजूने आलेल्या बिबळयाने हल्ला केला. पैठण तालुक्यातील वडजी येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. थेरगाव, दादेगाव, हर्षी,मुरमा या भागांतही बिबळ्याचा वावर आढळला. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भागात बिबळ्याचा वावर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. बिबळ्याने कुत्रे आणि कोंबड्या फस्त केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
मागील दोन दिवसांपासून बिबळ्याचा मुरमा, थेरगाव, हर्षी ,दादेगाव, वडजी या भागात मुक्तपणे संचार असल्याची चर्चा नागरिकांत आहे. चार दिवसांपूर्वीच वडजी येथील महिलेवर बिबळ्याने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना घडल्यापासून शेतीची कामं खोळंबली आहेत. बिबळ्या मुरमा शिवारात दिसला आहे. तरी वन विभागाने तातडीने या बिबट्यांस जेरबंद करण्यात यावे अशी मागणी मुरमा येथील प्रभारी सरपंच उषा दिनकर मापारी यांनी केली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराबाहेर एकट्याने जाण्याऐवजी दोघातिघांच्या गटाने जाण्यास सुरुवात केली आहे. नागरिक हाती लाठ्या काठ्या घेऊन वावरत आहेत. बिबळ्याला लवकर पकडावे अशी मागणी नागरिक करत आहेत.