जालना : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करत होते. हे उपोषण शासनाच्या शिष्टाईनंतर स्थगित झाले आहे. महायुती सरकारने मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात पाठवले होते. या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला यश आले. ओबीसींच्या प्रश्नांसाठी दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित झाले.
ओबीसींना विधिमंडळात आणि संसदेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले. यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सामोरे जात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेणार आणि ओबीसी, मराठा आरक्षणावर चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.